जातीमुळे घर देत नाही म्हणून पोलिसांच्या चकरा मारूनही पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत…
याला काय म्हणावे?
येत्या दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर कोर्टात दाद मागू…. तक्रारदार

अमळनेर : शहरात जातीय भेदभावाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. एका तक्रारदाराने आरोप केला आहे की, अमळनेर येथील संबंधित बिल्डर छोटू जैन यांनी जातीच्या कारणावरून घर देण्यास नकार दिला.
या प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून संबंधित व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून अमळनेर पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मात्र अद्याप तक्रार गुन्हा म्हणून दाखल करून घेतली गेलेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. जातीय कारणावरून घर नाकारणे हा गंभीर आणि कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरू शकणारा प्रकार असताना पोलीस प्रशासनाची भूमिका प्रश्नांकित ठरत आहे.
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, येत्या दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात दाद मागण्यात येईल तसेच अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार दाखल करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात पक्षकार (पार्टी) करण्यात येईल.
“जर जातीमुळे घर नाकारले जाते आणि त्याविरोधात तक्रार देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नसतील, तर आम्ही न्यायासाठी कोणाकडे जावे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणामुळे अमळनेरमध्ये सामाजिक समतेचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या आरोपांची तात्काळ दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी व योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
न्याय मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. तोच अधिकार जर दुर्लक्षित होत असेल, तर व्यवस्थेवरील विश्वास कसा टिकणार, हा खरा प्रश्न आहे.
