‘घराणेशाही’ची सरशी; कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची कुजबुज वाढली

0

“कार्यकर्त्यांनो बाजूला व्हा रे… निवडणुकीच्या मैदानात आले नातलग सारे…!”

 

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच जिल्ह्यासह अमळनेरातही घराणेशाहीचे राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. भाजप-राष्ट्रवादीसह विविध पक्षातील प्रमुख नेत्यांनी आपल्या नातलगांना सरळ निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर तीव्र होत चालला आहे.

जिल्ह्यातील दिग्गज नेते गिरीश महाजन, संजय सावकारे व मंगेश चव्हाण यांनी आपल्या पत्नींना संबंधित नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्याच धर्तीवर अमळनेरचे आमदार तसेच माजी मंत्री अनिल पाटील यांनी देखील आपल्या धर्मपत्नी जयश्री पाटील यांना प्रभाग-१५ मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी दाखल करून निवडणूक समीकरणांमध्ये नवा रंग भरला आहे.

जयश्री पाटील या यापूर्वी जिल्हा परिषद सदस्या राहिल्याने त्यांचे स्थानिक पातळीवर चांगलेच नेटवर्क आहे. मात्र, अचानक उभ्या करण्यात आलेल्या या उमेदवारीमुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना वगळून थेट कुटुंबीयांना संधी देण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यातच, जयश्री पाटील यांची जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून अंतर्गत असंतोष उफाळून येण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

एकूणच, आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्यांचा रोष असा संघर्ष आकार घेताना दिसत असून त्याचा परिणाम राजकीय समीकरणांवर कसा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!