सणांपूर्वीच भाजीमार्केटमध्ये गर्दीचा कोंडमारा
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा; प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव
अमळनेर : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजीमार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने आणि बाजारातील वाढती वर्दळ यामुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचा झाला आहे.
सकाळच्या वेळेत बाजारात सर्वाधिक गर्दी होत असून, दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहनांना मार्ग काढणे अवघड होत आहे. पादचाऱ्यांनाही याच गर्दीतून वाट काढावी लागत आहे. वाहन हटविण्यावरून नागरिक आणि वाहनचालकांमध्ये शाब्दिक वादाचे प्रसंगही घडत आहेत.
सणांच्या काळात गर्दी आणखी वाढणार असताना प्रशासनाकडून अद्याप ठोस वाहतूक नियोजन झालेले दिसत नाही. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी आणि वादाचे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

भाजीमार्केट परिसरात वाहनतळाची व्यवस्था करावी, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सणांच्या गर्दीपूर्वी प्रशासन जागे होणार की वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांनाच करावा लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महेश संदानशिव
ब्युरो चिफ, अमळनेर
