टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू
पती-पत्नीने दोन मुलांसह घेतला टोकाचा निर्णय; पहाटेची घटना, गावावर शोककळा
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील एका कुटुंबातील पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टाकरखेडा गावासह परिसरात खळबळ उडाली असून, गावावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल हे आपल्या दोन मुलांसह पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली झोकून दिल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत पती-पत्नी आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबीयांकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून, तपासानंतरच आत्महत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे.
