राजेश पाटलांना जनता स्वीकारेल की नाकारेल?
प्रभागातील न झालेल्या कामांचा मुद्दा ऐरणीवर

अमळनेर : नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असताना माजी नगरसेवक राजेश पाटील पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी त्यांना जनता स्वीकारेल का नाकारेल हा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांच्या प्रभागातील अनेक नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि नाराजीमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील पंचवार्षिकात प्रभागातील नागरिकांनी राजेश पाटील यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना नगरसेवक पदावर निवडून दिले होते. परंतु निवडून आल्यावर रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांमध्ये कोणतेही लक्षणीय काम झाले नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
“निवडून दिल्यानंतर आमच्या प्रभागात कोणतेही विकासकार्य दिसले नाही. समस्या मांडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही,” अशी भावना स्थानिकांतून व्यक्त होते.
राजेश पाटील यंदाही नगरसेवक पदासाठी नशीब आजमावत असून तरी मात्र मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसत आहे. “यावेळी खरोखर काम होईल का?” हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जातो आहे. अनेक मतदार निवडणुकीच्या प्रचारातील आश्वासनांना आता सरसकट विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे दिसते.
राजेश पाटील यांना पुन्हा संधी मिळेल की नाही, हे अखेर जनतेच्याच न्यायालयात ठरणार आहे. नागरिकांचा विसंबा पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना प्रभावी कारणे आणि भक्कम कामाचा आराखडा मतदारांसमोर ठेवावा लागेल, अशी चर्चा सुरु आहे.
